
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भारतीय सशस्त्र दलात चार वर्षे देशसेवा करून सेवामुक्त होणार्या अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी अग्निवीरांच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
11 जून 2025 रोजी डॉ. पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अग्निवीरांना चार वर्षांच्या लष्करी सेवेनंतर महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवांमध्ये संधी मिळावी, तसेच त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि शिस्तीचा शासनाला उपयोग व्हावा, अशी ठाम भूमिका मांडली होती. महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवांमध्ये माजी सैनिकांना 15 टक्के आरक्षण दिले जात असल्याचा संदर्भ देत अग्निवीरांसाठीही 5 ते 10 टक्के आरक्षणाचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. उत्तर प्रदेश सरकारने अग्निवीरांसाठी 20 टक्के आरक्षणाची घोषणा केल्याचाही संदर्भ देण्यात आला होता.
या विभागात संधी
शासन निर्णयात संभाव्य संधींच्या स्वरूपात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह पोलीस/रक्षक, अग्निशामक/बचावकर्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान व वाहनचालक, वनरक्षक तसेच महानगरपालिका/नगरपालिकांमधील अग्निशामक अशा विविध गणवेशधारी पदांचा उल्लेख करण्यात आला आहे.




