पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम व रिंगरोडसाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने वातावरण निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत अनेक प्रश्नांवर आश्वासने देण्यात आली.
सन २००२ च्या कुंभमेळ्यावेळी साधूग्राम, नांदूरनाका-जत्रा हॉटेल लिंक रोड आणि महामार्ग रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांनी स्वेच्छेने दिलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना व्याजासह तातडीने मोबदला देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मखमलाबाद परिसरातील अनेक बागायती जमिनी महसूल नोंदीत जिरायती दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत होता. मागील दहा वर्षांत बागायती पिकांची नोंद अथवा जलस्रोत उपलब्ध असल्यास त्या जमिनींना कायमस्वरूपी बागायती दर्जा देण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले.
साधूग्राम परिसरातील रेडीरेकनर दरातील तफावत, कमी मूल्यांकनामुळे होणारे नुकसान, तसेच नांदूर-दसक व आडगाव परिसरातील जमिनींचे फेरमूल्यांकन करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. आडगाव परिसरातील हायटेंशन लाईन व टॉवर स्थलांतरित करण्याबाबतही चर्चा झाली.दरम्यान, पंचक परिसरातील प्रस्तावित उड्डाणपुलावर रॅम्पची सुविधा देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली. बैठकीनंतर शेतकऱ्यांनी कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.




