अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य शासनाने थकीत पीक कर्जाच्या ओझ्यातून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तसेच नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना कमाल दोन लाख रूपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच एग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ व गारपीट यांमुळे पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या थकबाकीदार शेतकर्यांना नव्याने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मान्यता देण्यात आली. यानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जांपैकी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकर्यांना कमाल दोन लाख रूपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल. यापूर्वी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 चा लाभ घेतलेल्या पात्र शेतकर्यांना कमाल 50 हजार रूपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येईल.
ज्या शेतकर्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांना एकवेळ तडजोड योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार असून, यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येणार असून, शासनामार्फत याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिध्द करण्यात येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण व एग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य राहील.
वारसांची नोंद आवश्यक
अनेक पात्र शेतकरी आधार क्रमांक, बँक खात्याची अपूर्ण माहिती किंवा डिजिटल नोंदणीच्या अभावामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपले आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक व जमिनीच्या नोंदी अद्ययावत करून मृत कर्जदार खातेदारांच्या वारसांची नोंद करून घेणे आवश्यक आहे. तसेच, आधार नसल्यास तात्काळ नवीन आधार कार्ड काढून घ्यावे आणि आधार क्रमांकाशी चालू मोबाईल क्रमांक संलग्न (लिंक) करून घ्यावा, जेणेकरून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता येईल.




