मुंबई | Mumbai
दादरमधील रेल्वे स्थानक (Railway Station in Dadar) परिसरातील ८० वर्ष जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती.यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला होता . ‘एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आज युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिरात महाआरती करण्यासाठी जाणार होते. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली होती. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, भाजपच्या (BJP) लोकांनी दादर येथील हनुमान मंदिरात जाऊन थोडे नाटक केले. त्यानंतर या नोटीसीला हाताने पत्र लिहून स्थगिती देण्यात आली. म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. आम्ही सायंकाळी साडे पाचला हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही काल जे काही केले, त्यानंतर भाजपचे दुतोंडी आणि निवडणुकीपुरतेचे हिंदुत्व उघडे पडले. निवडणुकीसाठी हिंदुंना वापरले जाते. निवडणुका झाल्यानंतर यांच्याच राज्यात आमची मंदिरे सुरक्षित नसतात, त्यात हे हनुमानाचे मंदिर होते, असे त्यांनी म्हटले.
तसेच मुंबई भाजपकडून मुंबई रस्ता घोटाळाप्रकरणात (Mumbai Road Scam Case) एसआयटी चौकशी लावण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी बोलत होतो. जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप करत आहे. खोके सरकारच्या देखरेखीत मोठा घोटाळा झाला आहे. आता फडणवीसांचे सरकार आले आहे, त्यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी आहे, त्यांना जर स्वच्छ सरकार चालवायचे असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की या सर्वामध्ये त्यांचा हात नाही, आणि ठेकेदाराचा फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून (Cabinet) बाजुला ठेवावे तर आणि तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही, असेही त्यांनी म्हटले.