जालना । Jalna
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रलंबित मागण्या आणि कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा संघर्षाचे रान पेटवले आहे. येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील हालचालींना वेग आला असून, जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी तासभर चर्चा होऊनही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.
जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाची धग कमी करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटी येथे त्यांची भेट घेतली. “मी एक मित्र म्हणून या ठिकाणी आलो आहे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक आहेत,” अशी ग्वाही देत सत्तार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी ही विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली. “समाजाच्या हक्काशी दगा करून आम्ही जगू शकत नाही; सरकारने मराठा समाजाचे मोठे नुकसान केले असून आता माघार नाही,” असा ठाम इशारा जरांगे यांनी दिला.
आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. “आम्ही मुंबईत उपोषणासाठी येणारच आहोत. मुख्यमंत्री आमचेच आहेत, मग त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आंदोलनाला बसण्यास काय हरकत आहे? आम्ही बंगल्याच्या आवारात बसून हक्क मागू,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. कुणबी नोंदी आणि सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. त्यामुळे २९ ऑगस्टच्या उपोषणात संपूर्ण मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
सत्तार यांच्या शिष्टाईनंतरही जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने राज्य सरकारची अडचण वाढली आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकार प्रशासकीय व राजकीय पातळीवर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




