सोलापूर | Solapur
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी आज सोलापुरात वारीसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, असे आझमी म्हणाले. पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी १० मिनिटे रस्त्यावर नमाज पठण केल्यावर आमच्यावर कारवाया होतात, असे वक्तव्य आझमी यांनी केले आहे. त्यामुळे अबू आझमींच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
अबू आझमी नेमके काय म्हणाले?
आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं ५ ते १० मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
राज ठाकरे द्वेषाचे राजकारण करतात
राज उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते. दोघा भावांची ताकद आणि दोघांमधली दिवार ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकाच घरात जन्माला आले आहेत, त्यांनी एकसाथ राहावे. त्यात आम्हालाही आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेषाचे राजकारण करतात. दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांविरोधात बोलणे हेच राज ठाकरेंचे काम आहे, असेही आझमी म्हणाले.
चार फुटाचा माणूस
दरम्यान, यावेळी अबू आझमी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला. चार फुटाचा माणूस ज्याची कोणती लायकी नाही तो उघडपणे हे हिंदुत्ववादी सरकार आहे असे म्हणतोय, अशी टीका अबू आझमी यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांची टीका
अबू आझमी यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले. यावर बोलताना, मला वाटते की अबु आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधाने केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असे त्यांना वाटते. त्यामुळेच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




