महाबळेश्वर | Mahabaleshwar
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील (Mahabaleshwar-Poladpur Highway) धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात (Accident) घडून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोकण सफरीवरून परतणारी स्कॉर्पिओ जीप अचानक अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पोलादपूर तालुक्यातील (Poladpur Taluka) दाबेली गावाजवळ सोमवारी पहाटे सुमारे २:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील काही तरुण कोकणात पर्यटनासाठी गेले होते. सफर आटोपून परतीच्या प्रवासात ते आंबेनळी घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळली. काही स्थानिकांच्या माहितीनुसार ही दरी तब्बल १५०० फूट खोल असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपदा मित्र तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव पथकांकडून दुर्बिणींच्या सहाय्याने मृतदेहांचा शोध घेण्यात येत असून दोरखंडांच्या मदतीने जवान दरीत उतरले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित सहा जणांचा शोध सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे
महेश अनिल पवार (वय २५) आदित्य अशोक साळुंखे (वय २१) रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५) सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०) अंश समीर चव्हाण (वय १८) उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१) अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) नितीन किसन नायकोंडे (वय ३५)




