
जळगाव | Jalgaon
लग्नाची अक्षता सुकण्यापूर्वीच आणि हातावरची मेहंदी पुसण्याआधीच एका २१ वर्षीय नवविवाहितेवर (Newlywed Woman) काळाने झडप घातल्याची मन हेलावून टाकणारी घटना सोमवारी (दि. १३) जळगाव (Jalgaon) येथे घडली.
जळगाव विद्यापीठासमोर (Jalgaon University) एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नवविवाहितेचा जागीच दुर्दैवी मृत्यू (Death) झाला, तर तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे अपघातात प्राण गमावलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे.
अवघ्या ६ दिवसांपूर्वीच बांधली होती लग्नगाठ
अमळनेर तालुक्यातील (Amler Taluka) कोळपिंप्री येथील वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर येथील रहिवासी व पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात झाला होता. विवाह पार पडल्यानंतर नवदांपत्य नुकतेच देवदर्शन करून घरी परतले होते. घरी आनंदाचे वातावरण असतानाच सोमवारी वैशाली यांना पहिल्यांदा माहेरी नेण्यासाठी तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील हे जळगाव येथे आले होते.
माहेरी निघाल्या अन् वाटेतच काळाने गाठले
सोमवारी दुपारी जेवण आटोपल्यानंतर वैशाली या काका प्रवीण पाटील यांच्यासोबत दुचाकीने आपल्या कोळपिंप्री या माहेरच्या गावाकडे जाण्यास निघाल्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना, पाठीमागून अत्यंत वेगाने आलेल्या एका बेजबाबदार चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघेही दुचाकीवरून दूर फेकले गेले. या अपघातात वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे काका प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, परिसरात हळहळ
लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांतच वैशालीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पती विजय पाटील यांच्यासह सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अमळनेर तालुक्यातील (Amlner Taluka) कोळपिंप्री आणि जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघात घडवून फरार झालेल्या चारचाकी चालकाचा शोध घेतला जात आहे.




