अहिल्यानगर (प्रतिनिधी)
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांना सर्वाधिक चिंता भेडसावते ती अकरावीच्या प्रवेशाची. मात्र, त्यांना टेन्शन घ्यायचे कारण नाही. जिल्ह्यात यंदा अकरावीच्या तब्बल ३५ हजारांवर जास्तीच्या जागा आहेत. परिणामी, त्या शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कला, शास्त्र आणि वाणिज्य विभागातील अकरावीच्या ९८ हजार ५९० जागा असून दहावी पास झालेल्यांची संख्या ही ६३ हजार आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात सुमारे ३५ हजारांहून अधिक जागा शिल्लक राहणार आहेत.
चालूवर्षी दहावीसाठी जिल्ह्यातून एकूण ६८ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केले होते. यातील ६७हजार ९७० विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी ३४ हजार ३ विद्यार्थी व २९ हजार १ विद्यार्थिनी असे ६३ हजार ४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. दुसरीकडे यंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ८५ हजार ५९० जागा उपलब्ध आहेत.
या जागांपैकी सुमारे ४९ हजार ७७० जागा विज्ञान शाखेसाठी आहेत. ३२ हजार ४८० हजार जागा कला शाखेसाठी, तर १६ हजार ३४० हजार जागा वाणिज्य शाखेसाठी आहेत. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्यांच्या संख्याही ६३ हजार आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे अकरावी ऐवजी पट्टीकासह अन्य व्यवासायिक कोर्ससाठी प्रवेश घेत असतात. यामुळे अकरावी प्रवेशासाठीच्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. जिल्ह्यात ११ वीसाठी असणाऱ्या जागा आणि दहावी पास यांची तुलना केल्या ३५ हजारांहून अधिक जागा अतिरिक्त दिसत आहेत. यामुळे यंदा ११ प्रवेशासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची चिंता मिटणार आहे.
जिल्ह्यात एकूण ४५४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांत कला शाखेच्या ३७२, वाणिज्य शाखेच्या १७२, तर विज्ञान शाखेच्या ४९५, याशिवाय संयुक्त ३२ व ९ व्होकेशनल ९, अशा एकूण ११३९ मंजूर तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ८५ हजार ५९० विद्यार्थ्यांची आहे.
पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन प्रवेशासाठी नगर जिल्ह्यात कला शाखेत १३ हजार ६३६, वाणिज्य शाखा ६ हजार ५३७ आणि विज्ञान शाखा ३३ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यंदाच्या ११ प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पहिल्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांमध्ये मार्गदर्शन प्रवेश नोंदणी केंद्र सुरू आहे. आता दहावीच्या निकाल जाहीर झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी सुरू होणार आहे.





