अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 41 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 41. 2 अंश सेल्सिअस तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळीही झपाट्याने कमी होत आहे.
दरम्यान, परभणीत उष्माघातामुळे पहिला बळी गेला आहे. नाशिक येथून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. परभणीच्या नांदखेड रोड भागात ही घटना घडली आहे. शिवाजी बबन कांबळे वय 37 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर शिवाजी कांबळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरू नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसून येत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांत तापमानाने चाळिशीचा पारा ओलांडला आहे. इतकेच नाही तर काही भागांत तापमानाने 45 अंशांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यातच आता हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.





