नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला असून, शुक्रवारी (दि.24) घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुरुवार (दि. 23 जुलै) जिल्ह्याच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार या भागात जोरदार पाऊस कोसळला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी आणि भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागरिकांसह शेतकर्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तर काही ठिकाणी वार्याचा वेग 70 किमी प्रतितासापर्यंत पोहोकला होता. विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि कळवणसह घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता.
Nashik News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भलेमोठे लिंबाचे झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
24 जुलैला यलो अलर्ट
शुक्रवारी (दि.24) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो. घाट परिसरात मात्र ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
शनिवारी पुन्हा पावसाचा जोर
शनिवारी (दि. 25) घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.




