
अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात चालू खरीप हंगामात ९९.०३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी ऑगस्ट महिन्यांतील पावसाच्या मोठ्या खंडामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. पावसाने दिलेल्या ओढीमुळे मका, सोयाबीन, मूग आणि उडीद यांसारख्या प्रमुख पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला असून, यंदा उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, आता शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले असून सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकावर रस शोषणाऱ्या कीडाचा हल्ला होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलेला दिसत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर असून त्यापैकी ७लाख ९ हजार २७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मका (१६२.७७टक्के), तूर (१३३.९६ टक्के) आणि सोयाबीन (११२.११ टक्के) या पिकांची सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. तर बाजरी, मूग, उडीद आणि भुईमूग या पिकांचे पेरणी क्षेत्र घटले आहे. तर कपाशी पिकाची १ लाख ४२ हजार २६५ हेक्टरवर (९२ टक्के) लागवड झालेली आहे. सध्या पावसाने गेल्या महिनाभरापासून मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिके आता शेवटच्या घटीका मोजण्यास सुरू केली आहे. दरम्यान गेल्या महिनाभरापासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकावर रस शोषणाऱ्या कीडाचा हल्ला होतांना दिसत आहे. यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलेला दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणी झालेल्या पिकांची दुरावस्था झालेली असून परतीचा पाऊस न झाल्यास रब्बी हंगामाच्या पेरण्याची स्थिती बिकट होणार आहे.
सोयाबीन व मक्याची वाढ खुंटली
१ ते २४ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात केवळ २३.३ मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यातील भात, बाजरी आणि तूर ही पिके वाढीच्या संवेदनशील अवस्थेत असून त्यांना मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे. मूग आणि उडीद ही पिके सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत, तर सोयाबीन फुलोरा आणि कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत आहे. पावसात पडलेल्या खंडामुळे सोयाबीन व मक्याची वाढ खुंटली आहे.
आतापासून पाण्याची पळवापळवी
जिल्ह्यात आतापासून विविध शासकीय योजना, तलाव आणि पाईपलाईनमधून पाण्याची पळवापळवी सुरू झाली आहे. पाऊस न झाल्यास जिल्ह्याच्या विविध भागात शेतीच्या पाण्यासाठी लुट होणार असल्याचे चित्र आतापासून दिसत आहे. पाटपाणी असणाऱ्या भागात शेतकऱ्यांना दिलासा असला तरी उर्वरित ठिकाणी बळीराजाचे हाल होणार असल्याचे संकेत दिस लागले आहेत.




