
सातपूर | प्रतिनिधी | Satpur
रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे (Potholes) आणि पावसाळ्यामुळे झालेल्या निसरड्या रस्त्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, नाशिकच्या सातपूर परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सुजीत राजेंद्र गायकवाड (वय ३२, रा. सातपूर, नाशिक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सातपूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नाशिककरांच्या (Nashk) सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.०१ सप्टेंबर) रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास सुजीत गायकवाड हे निलय कंपनी आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळील भागातून दुचाकीवरून जात होते. यादरम्यान रस्त्यावरील खड्डा चुकवताना आणि निसरड्या रस्त्यामुळे (Road) त्यांच्या दुचाकीचा तोल गेला. अपघातात (Accident) सुजीत हे रस्त्यावर जोरात आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले; मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भुसारे पुढील तपास करत आहेत.
महापालिकेच्या ‘मलमपट्टी’विरुद्ध संताप!
सातपूर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून खड्डे आणि चिखलामुळे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाकडून केवळ खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली जाते, असा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित यंत्रणांनी तात्पुरते उपाय न करता रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी आता सातपूरकरांकडून केली जात आहे.




