
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता बळावली असून, आज (गुरूवार) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी होणार्या घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांनीही निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा केल्याने या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी (2 जून) झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणूक होणार की बिनविरोध पार पडणार, याचा निर्णय आज अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर स्पष्ट होणार आहे. महायुतीकडून भाजपचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे करण ससाणे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीऐवजी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर आणखी तीन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. बिनविरोध निवडीसाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी बुधवारी (3 जून) सायंकाळी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले. राज्यात महायुतीचे पारडे सध्या जड असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रभावी नेतृत्व असल्याचा उल्लेख करताना जगताप म्हणाले की, 4 जूननंतर निवडणूकीला सामोरे जाण्याची वेळ येईल असे वाटत नाही. बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न होतील आणि निवडणूक बिनविरोध पार पडेल.




