अहिल्यानगर । Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ नगरपरिषदांसाठी आज (मंगळवार) शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ४ पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे, उर्वरित ८ नगरपरिषदांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ६९, तर नगरसेवक पदांसाठी तब्बल ९२६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. थंडीचा प्रभाव असूनही शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले आहेत. दुपारपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीमुळे राजकीय पक्षांच्या गोटात उत्सुकता वाढली आहे.
जिल्हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५.५८ टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी चांगली मानली जात असून, दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी (दुपारी १.३० पर्यंत)
आठ नगरपरिषदांच्या मतदानामध्ये जामखेड नगरपरिषदेने आघाडी घेतली आहे, तर शिर्डीमध्ये सर्वांत कमी मतदान झाले आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, विविध नगरपरिषदांचे मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
- जामखेड – ४३.३८% (सर्वाधिक)
- राहाता – ४०.३०%
- संगमनेर – ३६.३३%
- शेवगाव – ३५.७०%
- राहुरी – ३४.७४%
- श्रीरामपूर – ३४.३०%
- शिर्डी – ३१.२२% (सर्वात कमी)
- श्रीगोंदा – ३१.३७%




