अहिल्यानगर (प्रतिनिधी)
गुरूवारी पुन्हा अवकाळी पावसाने पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, संगमनेर, राहाता आठ तालुक्यांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने कांदा, मका, गह, डाळिंब, द्राक्षे, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या आठ तालुक्यांतील १०३ गावांमधील १२ हजार ९९९ शेतकऱ्यांचे ८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी काही भागात तर बुधवारी राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर व पाथर्डी या सहा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पारनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली होती. गुरुवारी तिसऱ्या दिवशी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी नगर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका पीक आडवे झाले.
गुरुवारी सांयकाळी झालेल्या पावसामुळे तालुक्यानिहाय नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. पारनेर तालुक्यातील २४ गावातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक ३ हजार २०९ हेक्टरवरील ५ हजार ६९२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील ८ गावातील ५६ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक २७ हेक्टर क्षेत्राचे, कर्जत तालुक्यातील ३ गावातील ५.१ हेक्टरवरील ५ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक तर श्रीरामपूर तालुक्यात ३२ गावांमधील १ हजार ५६ हेक्टरवरील १ हजार ६०९ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यातील १५ गावातील ४५२ हेक्टरवरील ६६० शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आणि राहाता तालुक्यातील १७ गावातील ८७५ शेतकऱ्यांचे ५४६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. संगमनेरमधली २ गावातील १८० शेतकऱ्यांचे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा कृषी विभागाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
तालुकानिहाय बाधित गावे आणि शेतकरी
पारनेर २४ गावे आणि ५ हजार ९९२ शेतकरी, पाथर्डी ८ गावे आणि ५६ शेतकरी, कर्जत ३ गावे आणि ५ शेतकरी, श्रीरामपूर ३२ गावे आणि ५ हजार ४११ शेतकरी, नेवासा १५ गावे आणि ६५० शेतकरी, संगमनेर २ गावे आणि १८० शेतकरी, शेवगाव २ गावे आणि ४७ शेतकरी, राहाता १७ गावे आणि ९५८ शेतकरी यांचा समावेश आहे.





