मुंबई | Mumbai
‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अखेर विद्यार्थी आंदोलनाचा वाढता रेटा पाहून शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या यशानंतर मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वीर सावरकर मार्गावर भव्य ‘विजयी सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
‘जेन झी’ पिढीने सरकारच्या झिंज्या उपटल्या
सभेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवले आणि त्याला जे यश आले, त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत. या देशातील ‘जेन झी’ ने (Gen Z) या सरकारची कशी कोंडी केली, हे या आंदोलनातून दिसले”, असे त्यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली आणि उपस्थितांना त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक मिनिट मौन पाळण्याचे आवाहन केले.
‘तिरंगा मोर्चा’चे विजय सभेत रूपांतर
पूर्वी या सभेचे आयोजन निषेध मोर्चा म्हणून करण्यात आले होते; मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या मोर्चाचे रुपांतर भव्य ‘विजयी सभेत’ झाले. या सभेला मुंबईसह राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण हातात ध्वज घेऊन उपस्थित राहिले होते. सभेदरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.




