मुंबई | Mumbai
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला अणवस्त्रांवरुन सुनावले आहे. ते परभणी येथील सभेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “आमच्या देशाच्या लष्कराचे जेवढं बजेट आहे तेवढं तुमच्या देशाचं आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतापेक्षा अर्धा तास नाही तर ५० वर्षे मागे आहे.पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नये. पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जाते की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन निर्दोषांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात? तुमच्या कृती नरकाहून वाईट आहेत. आयएसआयएसचा (ISIS) वारसा तुम्ही पुढे चालवत आहात, त्यामुळे आम्हाला शिकवू नका,” असे ओवैसी यांनी म्हटले.
तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तान आजच नाही गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या (India) कुरापती काढतो आहे. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. काही टीव्ही चॅनल्सचे अँकर्स हे काश्मिरी नागरिकांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे. काश्मीर आपले आहे आणि आपलंच राहिल. भारताचे अभिन्न अंग म्हणजे काश्मीर. आपण काश्मिरी लोकांवर संशय कसा घेऊ शकतो? एक काश्मिरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले अशा लोकांवर आपण संशय घेता कामा नये”, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.