नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण टेकऑफपूर्वी रोखण्यात आले. विमानाच्या अनिवार्य तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरही एअर इंडियाच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आज दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आले आहे.
कंपनीने सांगितले की, एअर इंडियाचे दिल्लीहून पॅरिसला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर AI143 विमान रद्द करण्यात आले आहे. उड्डाण करण्यापूर्वी आवश्यक तपासणी दरम्यान विमानात काही तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आज सकाळी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द झाले. त्यानंतर अमृतसरहून लंडनला जाणारे विमानही रद्द करण्यात आले. आता दिल्लीहून पॅरिसला जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहे. दिवसभरात एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित होती.
Air India Spokesperson says, "Flight AI143 from Delhi to Paris of 17 June has been cancelled. The mandatory pre-flight checks identified an issue which is being presently addressed. However, in view of the flight coming under the restrictions on night operations at Paris Charles…
— ANI (@ANI) June 17, 2025
एअर इंडियाकडून याबद्दल निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात म्हटले की, एअर इंडियाच्या AI143 विमानाची पूर्वतपासणी करण्यात आल्यानंतर त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.’वेळेची कमतरता आणि पॅरिस चार्ल्स डी गॉल (CDG) या पॅरिसमधील विमानतळावर रात्रीच्या वेळेस निर्बंद असल्याने विमान कंपनीने विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. १८ जून रोजी पॅरिसहून दिल्लीला जाणारे परतीचे विमान AI143 देखील रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करत आहोत. त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास किंवा वेळापत्रकात बदल केल्यास त्यांनी पूर्ण परतफेड केली जाईल’, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, आजचे उड्डाण रद्द झाल्यामुळे उद्या (१८ जून) पॅरिसहून दिल्लीला परतणारे AI142 हे विमानही रद्द करण्यात आल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे.
१२ जून रोजी झालेल्या AI 171 विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान नागरी वस्तीवर कोसळले होते आणि मोठी दुर्घटना घडली होती.




