नाशिक | Nashik
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारूण पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या दणदणीत विजयानंतर माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंनी (Gokul Gite) ‘नरेंद्र दराडे यांच्यावर मतदारांचा प्रचंड रोष होता. शिवसेनेने एक निष्क्रिय उमेदवार रिंगणात उतरवला होता, मात्र माझ्या रूपाने आता मतदारसंघाला योग्य आमदार मिळाला आहे’, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
यावेळी गोकुळ गिते म्हणाले की, “गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात नरेंद्र दराडे (Narendra Darade) हे मतदारांसाठी (Voter) कधीही उपलब्ध झाले नाहीत. त्यांनी मतदारसंघात कोणताही भरीव विकासनिधी आणला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नापसंती होती आणि त्यांनी विश्वास गमावला होता”, असे त्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री महाजनांची माफी मागतो
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन मी माझा अधिकृत प्रचार थांबवला होता. मंत्री महाजन यांचा माझ्यावर शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेण्यासाठी मोठा दबाव होता. मात्र, माझ्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच हा विजय शक्य झाला आहे, त्याबद्दल मी मंत्री महाजन आणि एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागतो,असेही गोकुळ गिते म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया
पक्ष आदेश आणि व्हीप नंतर, मतदारांचे वैचारिक मत महत्त्वाचे!
गोकुळ गिते पुढे म्हणाले की, “जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच गणेश गितेंसाठी माझी पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली होती. ही जागा भाजपला सुटेल अशी आम्हांला अपेक्षा होती, मात्र ऐनवेळी ती शिवसेनेला सुटली. महायुतीचा एक घटक म्हणून आम्ही गणेश गिते आणि दीपाली गिते यांनी स्वतः मतदारांना दराडेंना मतदान करण्याचे आवाहन केले होते. परंतु, मतदारांना स्वतःचे वैचारिक मत असते. पक्ष आदेश आणि व्हीप हे नंतरचे विषय असतात. मी एका निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो, म्हणूनच मतदारांनी दराडेंना नाकारून मला कौल दिला, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय
विजयानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न गोकुळ गिते यांना माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की,”पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेईन. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल,” असे गोकुळ गिते यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Nashik MLC Election : महायुतीसाठी निकाल धक्कादायक, आमच्या रक्तात विश्वासघात…; दराडेंच्या आरोपांवर मंत्री महाजनांचे प्रत्युत्तर




