नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर विमान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या दुर्घटनेपासून गेल्या पाच दिवसांत जगभरात काही ठिकाणी बोईंग विमानातील तांत्रिक समस्यांच्या घटना समोर आल्या आहेत. भारतात एअर इंडियाच्या काही विमानांचे तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केल्याचेही समोर आले आहे. अशीच एक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मंगळवारी कोलकाता विमानतळावर विमानाच्या नियोजित थांब्यादरम्यान प्रवाशांना उतरवावे लागले. फ्लाइट AI180 वेळेवर १२.४५ वाजता विमानतळावर पोहोचले, परंतु डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाणाला उशीर झाला. आज पहाटे ५.२० वाजता सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैमानिकानं प्रवाशांना दिली.
नेमके काय घटना घडली?
एअर इंडियाचे विमान AI180 वेळापत्रकानुसार सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून निघाले. सोमवारी रात्री १२:४५ वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचल्यावर डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. चार तासांहून अधिक काळानंतर, आज (दि.१७) पहाटे ५:२० वाजता, सर्व प्रवाशांना विमानातून उतरावे लागेल, असे सांगण्यात आले. उड्डाण सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विमानाच्या कॅप्टनने प्रवाशांना सांगितले.
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री कोलकाता विमानतळावर या सर्व घडामोडी घडण्याआधी दिवसभरात तीन वेळा एअर इंडियाच्या विमानांचे इमर्जन्सी लँडिंग किंवा पुन्हा मूळ विमानतळावर लँडिंग करण्याची वेळ ओढवली. सोमवारी सकाळी मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या AI2493 या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. व्यवस्थेतील काही अडचणींमुळे विमान उड्डाणासाठी उशीर झाला.
दिल्लीला येणाऱ्या विमानात बिघाड
सोमवारी हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान AI315 ला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्यानंतर त्याच्या मूळ ठिकाणी परतावे लागले. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरने चालवलेले हे विमान AI315 हाँगकाँगहून दिल्लीला निघाले होते. भारतात एअर इंडियाकडून बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान वापरले जात आहे.
दुसरीकडे दिल्लीहून रांचीच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडाच्या संशयामुळे पुन्हा दिल्लीला लँड करण्यात आले. बोईंग ७३७-८ श्रेणीतील विमान रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी उतरणे अपेक्षित होते. पण टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाडाची शंका उपस्थित झाल्यानंतर ते पुन्हा दिल्ली विमानतळावर लँड करण्यात आले. विमानाची तपासणी केल्यानंतर उड्डाण नियोजनानुसार झाल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे विमान AI-171 ने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर काही सेकंदातच ते मेडीकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानात २३० प्रवासी, १० केबिन क्रू सदस्य आणि दोन पायलट असे २४२ प्रवासी होते. त्यातील विश्वास कुमार रमेश वगळता सर्वांचा मृत्यू झाला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





