नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगितली. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन उड्डाण केले होते. उड्डाणानंतर ६५०-७०० फूट उंचीवर विमान गेले आणि ज्यानंतर हे विमान वेगाने खाली आले असं मंत्रालयाने सांगितले.
या पत्रकार परिषदेत नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंची गाठू शकली. त्यानंतर हे विमान खाली येऊ लागले. पायलटने दुपारी १.३९ वाजता एटीसीला मे डे कॉल दिला होता. एक मिनिटानंतर विमान मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या दुर्घटनेआधी हे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबादला विना कुठल्याही तांत्रिक समस्येशिवाय पोहचले होते असेही त्यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: #AhmedabadPlaneCrash | Union Civil Aviation Minister Ram Mohan Naidu Kinjarapu says, "To further investigate the incident and to look into all the theories and other information that is going around this incident, we felt it would be much better to have another… pic.twitter.com/gObuHia5Cq
— ANI (@ANI) June 14, 2025
केंद्र सरकारने एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सचिवांच्या पातळीवरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अपघाताची कारणे तपासणे, एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घेणे आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना सुचवणे अशी कामे समितीद्वारे केली जातील.
मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, “DGCA च्या निर्देशानंतर या दुर्घटनेनंतर एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787 ड्रीमलायनर ताफ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. भारतात सध्या असलेल्या ३४ ड्रीमलायनर विमानांपैकी आठची आधीच तपासणी झाली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
तांत्रिक तपास करणाऱ्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घटनास्थळी ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे. या ब्लॅक बॉक्सचे डिकोडिंग केल्यावर अपघाताच्या क्षणी किंवा अपघात होण्याआधी नक्की काय घडले होते याचा सखोल तपशील समोर येईल. आम्ही सुद्धा AAIB कडून होणाऱ्या संपूर्ण चौकशीचा अहवाल आणि निष्कर्ष काय असतो याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत.”
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. ज्यातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे केवळ एकमेव प्रवासी या भीषण अपघातातून सुखरूप बचावला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज परिसरातील इमारतीला धडकले तिथल्या ४० हून अधिक जणांचा जीव गेल्याची भीती वर्तवली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




