मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रासह देश हळहळला. दरम्यान रोहित पवार यांनी मुंबई दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनी आणि डीजीसीएवर गंभीर आरोप केले. त्यानंतर डीजीसीएने VSR कंपनीवर कारवाईही केली. दरम्यान आज खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचा अपघात हा सदोष मनुष्यवधच आहे असे म्हटले आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“रोहित पवार काल मला भेटले आणि या हवाई क्षेत्रातील काही तज्ज्ञ, वैमानिक, फिल्डवर काम करणारे तंत्रज्ञ, मी आणि रोहित पवार यांनी चर्चा केला. रोहित पवार यांनी या क्षेत्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांचा अभ्यास थक्क करणारा आहे. दृश्यमानता ते ब्लॅक बॉक्सपर्यंत रोहित पवार यांनी बरीच माहिती दिली. मी ही त्या गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे की सरकार याला अपघात म्हणत आहे, आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो. या घटनेला महाराष्ट्र सराकर, राज्याचे मुख्यमंत्री हलक्यात घेत आहेत. त्यादिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांना जो आक्रोश फुटला होता, तो खरा की खोटा असा प्रश्न पडला आहे. इतके ही गांभीर्य नाही की एक सहकारी आपण या संशयास्पद अपघातात गमावला आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
तुमचे अश्रू मगरीचे होते
रोहित पवार यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन VSR कंपनी आणि डीजीसीए यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करणारी तक्रार दाखल केली. मात्र रोहित पवारांची मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसाठी त्यांचा नातेवाईक पोलीस ठाण्यात येतो आणि तक्रार करतो आणि तक्रार घेतली जात नाही. मरिन ड्राईव्हचे डीसीपी होते त्यांना एक फोन आला. त्या दबावातून तक्रार घेतली गेली नाही. याचा अर्थ तुमचे अश्रू मगरीचे होते, डीजीसीएने अशा अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केल्या आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
बारामती माझा श्वास आहे, तो कधीच थांबणार नाही…; बारामती पोलिस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी
संजय राऊत यांनी नागरी विमान वाहतूक संचालनालयावर तोफ डागली आहे. “DGCA हे देशातील अत्यंत भ्रष्ट खाते असून अनेक राजकारण्यांचे त्यांना आशीर्वाद आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही तो खराब झाल्याचे खोटे सांगितले जात आहे,” असा दावा त्यांनी केला. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सदोष मनुष्यवध केले आहेत आणि त्यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकलेले नाही. कारण खासगी विमान कंपन्यांना डीजीसीएचा आशीर्वाद असणे आवश्यक असते. अनेक राजकारण्यांचे VSR ला आशीर्वाद आहे. मी कागदपत्रांसह काही गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामुळे डीजीसीए आणि व्हिएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजितदादांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवध आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
VSR कंपनीत अनेकांचे पैसे गुंतले आहे
अजित पवारांच्या अपघाताचं प्रकरण दाबले जाते आहे. VSR कंपनीत अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतले आहेत. रामा नायडू हे चंद्राबाबू नायडूंच्या पक्षातले आहेत. चंद्राबाबू नायडू आणि या कंपनीची आर्थिक देवाणघेवाण आहे. अशावेळेला काय तपास करणार? रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहेत त्यांचं स्पष्टीकरण, उत्तरे आली पाहिजेत. आमचीही हीच भावना आहे. मुंबईत तक्रार दाखल करणे आवश्यक होते. आज रोहित पवार बारामतीत आहेत. तक्रार दाखल करणार आहेत. विधीमंडळातही हा विषय समोर आला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत एफआयआर का दाखल होत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. “सुनेत्रा पवार यांना आमदारांनी उपमुख्यमंत्री केले असले तरी, त्यांनी पत्नी म्हणून मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे की गुन्हा दाखल का होत नाही? कोणाचा फोन आल्यावर डीसीपींचे वर्तन बदलले आणि हे प्रकरण दाबले गेले?” असे आरोप राऊत यांनी केले.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “अजित पवारांना भाजपमधून बाहेर पडायचे होते, पण भाजपने त्यांची फसवणूक केली. आता एकत्र येण्याची प्रक्रिया संपली आहे.” तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या ३६ हजार कोटींच्या मुदत ठेवीमोडीत काढण्यावरून त्यांनी सरकारवर ‘मुंबईची लूट’ केल्याचा आरोप केला.





