Saturday, April 11, 2026
HomeराजकीयRohit Pawar : "सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत…"; रोहित पवार का...

Rohit Pawar : “सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत…”; रोहित पवार का संतापले?

मुंबई । Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागात मात्र संशयास्पद हालचाली झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्या निधनानंतरच्या अवघ्या काही तासांतच प्रलंबित असलेल्या ७५ महत्त्वाच्या फाईलींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सह्या केल्या आहेत. ज्या प्रस्तावांवर खुद्द अजित पवार आणि माणिकराव कोकाटे विचारविनिमय करत होते, त्या फाईलींना कोणत्याही सखोल तपासणीशिवाय मंजुरी मिळाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता आणि सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, एकीकडे राज्य शोकाकुल असताना दुसरीकडे मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत स्वतःचा ‘स्वार्थ’ साधल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी सात संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आला, ही बाब अत्यंत संशयास्पद मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सगळंच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत उरली आहे की नाही?” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेवर ताशेरे ओढले. माणसाच्या निधनानंतर किमान काही भावना आणि संवेदना असणे अपेक्षित असते, पण इथे केवळ फाईलींचा निपटारा करण्याला प्राधान्य दिले गेले, असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या जाण्याने व्यथित झालेल्या रोहित पवारांनी आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अल्पसंख्याक विभागाने स्थगिती दिलेल्या ७५ शाळांना या काळात तातडीने अल्पसंख्याक संस्था किंवा शाळांचा दर्जा दिला आहे. या प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या तारखा या शासकीय दुखवट्याच्या काळातीलच आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कोणत्या बड्या अधिकाऱ्याने हे कारस्थान रचले, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जनसामान्यांमधूनही या प्रवृत्तीचा निषेध होत असून, संवेदनाहीन झालेल्या या व्यवस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अजित पवार यांचा मृत्यू हा केवळ अपघात आहे की घातपात, असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी आधीच सरकारला धारेवर धरले आहे. आता या फाईल प्रकरणाने आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, त्यांनी घेतलेल्या आक्रमक पत्रकार परिषदेनंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. “माझा काका गेलाय, सरकारला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील,” अशा ठाम भूमिकेत रोहित पवार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ एप्रिल २०२६ – कर्तव्य कठोरतेचा राजकीय अडथळा

0
एखादा अधिकारी जनतेला हवाहवासा वाटत असताना प्रशासकीय यंत्रणेचे सूत्रसंचालन करणार्‍यांना मात्र नकोसा का होतो, या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. ज्या प्रश्नाचे उत्तर सर्वविदीत असूनही...