मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही धक्क्यात आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंगच्या काही वेळ आधी हे विमान कोसळले. या घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असतानाच आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे. या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, आता थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (DGCA) कारवाईची टांगती तलवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार डीजीसीए विरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणार आहेत. विमान अपघातानंतर संबंधित ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीवर तत्काळ कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, या कारवाईला झालेला विलंब आणि कंपनीच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होणारे प्रश्नचिन्ह यामुळे संशयाचे वातावरण गडद झाले आहे. या निष्काळजीपणासाठी डीजीसीएला जबाबदार धरत दोन्ही आमदार कायदेशीर पाऊल उचलणार आहेत.
आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच या घटनेवर स्पष्ट शब्दांत संशय व्यक्त केला होता. त्यांनी थेट व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेवर बोट ठेवत या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती. विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप होत असतानाही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे आता या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
या विमान अपघाताने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण केली आहे. तांत्रिक बिघाड की घातपात, या वादात आता पोलीस तक्रारीमुळे नवीन तथ्ये समोर येण्याची चिन्हे आहेत. डीजीसीएने संबंधित कंपनीवर कारवाई करण्यास नेमका उशीर का केला, हा मुख्य प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता पोलीस तपासाकडे लागले आहे.




