श्रीरामपूर । Shrirampur
शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरात सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील हनुमान मंदिर येथून सकाळी १० वाजता मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात शहरासह तालुक्यातील विविध भागांतील सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात तीव्र जनआक्रोश व्यक्त झाला.
मोर्चामध्ये व्यापारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “आकाश दुबय्या यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “संघटित गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत संबंधित टोळ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात आकाश दुबय्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, संघटित गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या टोळ्यांवर मोक्का किंवा इतर संबंधित कायद्यांतर्गत प्रभावी कारवाई करावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अशोक थोरे, सुनील मुथा, भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार लहू कानडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला पाठीशी घातले जाणार नाही, असा ठाम संदेश देत आकाश दुबय्या यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने प्रभावी कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.




