नवी दिल्ली | New Delhi
यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) येत्या शुक्रवारपासून नवी दिल्ली (New Delhi) येथील ताल कटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत होणार आहे. या संमेलनात दि.२१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा, पुस्तक प्रकाशन, काव्यवाचन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी आज नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात आयोजित या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. तत्पूर्वी सकाळी ध्वजारोहण करन ग्रंथ दिंडी काढण्यात येईल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी सहभागी होणार आहेत.
विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन (Kavi Sammelan) होईल. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होतील. शनिवारी २२ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे ‘मराठी पाऊल पडते पुढ’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, ‘मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार’, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब आणि सायंकाळी ‘मधुरव हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभा मंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’ बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन व साहित्यफ, मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले सभामंडप येथे कवी कट्ट्याचे आयोजन केले आहे.
सभामंडपांना महापुरुषांची नावे
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांची नावे सभामंडपाला असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले आहे. संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल्स असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून, तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास विदेशातूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याची माहिती नहार यांनी दिली.
रविवारी समारोप
रविवारी शेवटच्या दिवशी २३ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’, ‘नाते दिल्लीशी मराठीचे’ आदी कार्यक्रम आहेत. यशवंतराव चव्हाण सभामंडप येथे ‘अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व सृजनशीलता’ या विषयावर परिसंवाद आहेत. सायंकाळी ‘खुले अधिवेशन व समारोप’ असे सत्र असणार आहे.
विशेष रेल्वे
१९ फेब्रुवारीला पुणे येथून विशेष रेल्वे दिल्लीसाठी येणार असून, या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.