नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा थेट परिणाम धरणांतील पाणीसाठ्यावर होताना दिसत आहे. तापमानाने ४० सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून जिल्हातील सात मोठे व १९ लहान अशा २६ धरण समूहात वापरायोग्य ३७.६० टक्के पाणीसाठा असून या साठ्यात उन्हामुळे झपाट्याने घट होत आहे. यामुळे पाऊस वेळेवर न पडल्यास आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील धरण समूहातील एकूण पाणीसाठा सध्या ३७.६० टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत खूप चांगली स्थिती आहे. (मागील वर्षी २९.२० टक्के). शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्व-४९.५० टक्के तर गंगापूर धरण समूहात ५२.४० टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी ४१.१९ टक्के साठा होता. उच्च तापमानामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन जलद गतीने होत असून, ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल्स आणि लहान जलस्रोतांची पा तळीही घटत आहे. त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्धता कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हातील काही तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल आणि वाढते तापमान यामुळे भविष्यात अशी परिस्थिती वारंवार निर्माण होण्याची शक्यता असून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
नाशिक जिल्ह्यातील २६७ गावांतील १ लाख ४८ हजार ८०२ लोकसंख्येला ८३ टँकरच्या १६५ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात १०८ टँकर सुरू होते. यावर्षी पाण्याची टंचाई वाढल्याचे चित्र आहे. पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्ह्यातील २८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक १४ विहिरी मालेगाव तालुक्यातील आहेत.
लोकशाही धोक्यात, आनंद कसला? बंगालच्या निकालानंतर राहुल गांधींनी स्वकीयांचे टोचले कान
येवल्यात सर्वाधिक टँकर
येवला तालुक्यामध्ये ३३ टँकरच्या माध्यमातून ५५ फेऱ्या मारल्या जात आहेत. त्याखालोखाल इगतपुरी तालुक्यात १४ टँकरच्या माध्यमातून ३० फेऱ्या मारल्या जात आहेत. मालेगावमध्ये १४ टँकर २७ फेऱ्या, सिन्नर ९ टँकर २५ फेऱ्या, चांदवड ५ टँकरद्वारे ११ फेऱ्या, पेठ ५ टैंकर ११ फेऱ्या, देवळा ३ टैंकर ५ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडून अशा पद्धतीने टँकरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे.





