अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2017 पासून 2024 पर्यंत अकाले तालुक्यातील वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्या वेतन, 7 व्या वित्त आयोगाचा फरक आणि अन्य रक्कमेपोटी 4 कोटी 14 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेच्या तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणात 3 मुख्य संशयीत आरोपीसह अन्य 53 जणांच्या खात्यावर अपहारातील कोट्यावधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या महिन्यांत वर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने 3 मुख्य दोषींसह ज्या 53 कर्मचार्यांच्या खात्यावर अपहाराची रक्कम गेलेली आहे, अशा 56 जणांना पुढील 15 दिवसात आधी अपहाराची रक्कम भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाची गेल्या मार्च महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या अर्थखात्याकडून चौकशी सुरू होती. ही चौकशी आतापूर्ण झाली असून यात प्राथमिक माहितीत चार कोटी 14 लाखांचा शासकीय पैशांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणी 56 आरोग्य कर्मचार्यांना नोटीसा बजावत अपहार केलेल्या रक्कम तातडीने जिल्हा परिषदेकडे भरण्यास बजावले आहे. यासाठी 18 जुलैपर्यंत 15 दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात अकोले पंचायत समितीच्या अपहाराचा मुद्दा गाजत आहे. या प्रकरणी आरोग्य विभागासह जिल्हा परिषद प्रशासनाने गोपनियता पातळ चार ते महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी केली.
यात प्रकरणातील संशयीत आरोपी मंदार श्रावणा पावडे (कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी), भीमाशंकर शशिकांत देशमुख (कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र मावेशी), अरुण लक्ष्मण गायकवाड (कनिष्ठ सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राम्हणवाडा) या तिघा मुख्य कर्मचार्यांनी 2017 पासून 2024 पर्यंत 53 आरोग्य कर्मचार्यांच्या खात्यावर वेळावेळी 4 कोटी 14 लाख रुपयांची रक्कम पगार, 7 व्या वेतन आयोगासह अन्य कारणापोटी वर्ग केला. संबंधीत 53 कर्मचार्यांनी देखील जादा आलेल्या रक्कमेबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली नाही.
यामुळे या प्रकरणात त्यांचा देखील सहभाग असल्याचे जिल्हा परिषदेेच्या अर्थ विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात मुख्य तिघांसह उर्वरित 53 अशा 56 कर्मचार्यांना आधी पुढील 15 दिवसात अपहार केलेल्या 4 कोटी 14 लाखांची रक्कम जिल्हा परिषदेला परत करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढली आहे.
या प्रकरणात सेवानिवृत्त झालेल्या अर्थ विभागाच्या आधी अकोले तालुक्यात कार्यरत असणार्या आणि त्यानंतर नगरला बदली झालेल्या सहायक लेखाधिकारी यांनी तक्रार केल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा अपहार समोर आला. या प्रकरणात वाटा न मिळालेल्यांनी हे प्रकरण उजेडात आणले असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले असून यात नगरच्या आरोग्य खात्यात कार्यरत असणार्या घुले नावाच्या एका सहायक लेखाधिकारी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले.
रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल होणार
दरम्यान, या कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणात पहिल्या टप्प्यात संबंधीत दोषींकडून घोटाळा केलेल्या 4 कोटी 14 लाख रुपयांची रक्कम भरून घेण्यात येणार आहे. या प्रकरणात काही दोषी कर्मचारी सेवानिवृत्त असून काही सेवेत आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ही रक्कम भरावी लागणार आहे. रक्कम न भरणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.





