Tuesday, September 8, 2026
HomeनगरEarthquake Tremor : अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के?

Earthquake Tremor : अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के?

अकोले/राहुरी |प्रतिनिधी| Akole | Rahuri

अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील काही गावांना काल शनिवारी रात्री 10.02 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती दिली गेली नसल्याने अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अकोले तालुक्यातील कळस, सुगाव, औरंगपूर या गावांमध्ये तसेच संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवारी (दि. 8) रात्री दहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांकडून समजली. भूकंपाचे अचानक सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, यामध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, याबाबत प्रशासनाकडूनच अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतरच दुजोरा मिळू शकतो.

- Advertisement -

राहुरी शहरासह तालुक्यातील काही भागात काल शनिवारी रात्री 10.02 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून नाशिकच्या उत्तर-वायव्य दिशेला सुमारे 49 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिल्याचे मेसेज सोशल मिडियावर रात्री दिसत होते. रात्रीच्या वेळी अचानक घरांना हादरा जाणवल्याने काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही घरांवरील पत्रे थरथरली, तर काही ठिकाणी मांडणीवरील भांडी खाली पडल्याचे नागरिकांनी सांगितले. घरातील वस्तूंना किरकोळ हादरे बसल्याने अनेकांना भूकंपाची जाणीव झाली.

जमीन हादरल्याचे जाणवताच अनेक नागरिकांनी तत्काळ घराबाहेर येत शेजारी व नातेवाईकांशी संपर्क साधला. काहींनी मोबाईलवरून एकमेकांना फोन करून आपल्या परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला का, याची खात्री करून घेतली. रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला नेमके काय घडले, याबाबत नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. हा धक्का जाणवण्यापूर्वी किंवा त्याचवेळी ग्रामीण भागातील काही पाळीव प्राण्यांमध्ये अस्वस्थता जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. घरांच्या परिसरात बसलेली जनावरे अचानक उठल्याचे, तर काही ठिकाणी पक्षांनीही काही काळ किलबिलाट केल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले. रात्रीच्या वेळी अचानक जाणवलेल्या हादर्‍यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...