अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर-दौंड डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अकोळनेर ते निंबळक या 18.21 किलोमीटर अंतरावरील पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी सोमवारी (दि. 18) यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी अकोळनेर ते निंबळक द्रुतगती रेल्वेमार्गाच्या चाचणीवेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त गुरू प्रकाश, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी (बांधकाम), सहाय्यक कार्यकारी अभियंता राजनारायण सैनी, अजय सिंह, धर्मेंद्र कुमार, सिनियर सेक्शन इंजिनिअर आर. डी. सिंह, अजय राणा, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, प्रगती पटेल, परशुराम राठोड, धम्मरत्न संसारे,रामजी कुमार, प्रशांत कुमार आदी उपस्थित होते.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नगरच्या रेल्वे प्रवासाला मोठी गती मिळणार असून भविष्यात रेल्वे सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर धावणार आहे. नगर-दौंड द्रुतगती डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मार्गाचे आधुनिकीकरण करण्यात येत असून सर्वत्र इलेक्ट्रिक इंजिनद्वारे रेल्वे वाहतूक सुरू करण्यावर भर दिला जात आहे. यापूर्वी नगर-मनमाड मार्गावरील विविध टप्प्यांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून 184 किलोमीटर डबल लाईन मार्गाची यशस्वी तपासणी झाली आहे.
मनमाड-दौंड रेल्वे मार्गामध्ये अहिल्यानगर रेल्वे स्थानक हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र, अनेक वर्षांपासून हा मार्ग सिंगल लाईन असल्याने रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित राहत होता. अनेकदा क्रॉसिंगसाठी रेल्वेगाड्यांना तासंतास थांबावे लागत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात होता. आता डबल लाईनचे काम पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे विनाकारण होणारे थांबे बंद होणार असून रेल्वे वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशी क्षमता विकसित करण्यात येत आहे.
सोमवारी झालेल्या चाचणीत द्रुतगती मार्गावरील रेल्वेचा नेमका वेग, ट्रॅकची क्षमता आणि सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली. नगर ते दौंड या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्य अभियंता (बांधकाम) सागर चौधरी यांनी सांगितले की, अकोळनेर ते निंबळक डबल लाईन द्रुतगती रेल्वे मार्गाच्या पाचव्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. या प्रकल्पामुळे नगरच्या रेल्वे प्रवासात ऐतिहासिक बदल होणार असून प्रवाशांना सुपरफास्ट सेवांचा लाभ मिळेल.





