नाशिक । प्रतिनिधी Nashik
देशातील शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आज सकाळी किसान सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, खा. भास्कर भगरे, खा. डॉ. शोभा बच्छाव, आ. हिरामण खोसकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयसीआरचे संचालक डॉ. एस. के. रॉय, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितीन ठोके आदी उपस्थित होते. प्रारंभी मंत्री चौहान यांनी स्वयंसहाय्यता बचतगटांच्या स्टॉलला भेट देत महिलांशी संवाद साधला.
मंत्री चौहान म्हणाले की, शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक शेतकर्यामध्ये आपण देव पाहतो. शेतकर्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. शेतकर्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पीकविमा योजनेचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी गाव व पंचायत स्तरावर उपग्रह प्रणालीद्वारे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. त्यामुळे अचूक प्रक्रिया होऊन शेतकर्यांना देय भरपाई डी.बी.टी.द्वारे त्वरित प्रदान केली जाईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
शेतकर्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लागणारी खते ही स्वस्त दरात उपलब्ध करण्यात येत आहेत. यासोबतच शेतकर्यांच्या उत्पादित निर्यातक्षम मालाला योग्य मोबदला व बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त आहेत. शेतकर्यांना परदेशी द्राक्षांची नवनवीन वाणांची उपलब्धता कशी करता येईल, यासाठी बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे राबवल्याबाबत केंद्रीय मंत्री चौहान यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
मंत्री अॅड. कोकाटे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील आहे. येथील शेतकरी नेहमीच नावीन्याचा शोध घेतात, असे सांगत आगामी काळात कृषी विभागातर्फे ड्रोन वापराला प्राधान्य देण्यात येईल. राज्य सरकारतर्फे ऑनलाईन पोर्टल तयार करून ते महसूल विभागाशी जोडून शेतकर्यांना मिळणार्या अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येईल, असेही मंत्री कोकाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जळगाव (ता. निफाड) येथील ‘नमो योजनेत’ ड्रोनप्राप्त प्रगतिशील शेतकरी दीपाली मोरे, मधुकर गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोरे, गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.