नवीन नाशिक | प्रतिनिधी
मुंबईहून उत्तरप्रदेश व राजस्थानात जाणारे पाच ट्रक नाकेबंदी सुरू असताना कारवाई करत पोलिसांनी गरवारे पॉईंट येथे पकडले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही ट्रक मधील उत्तर भारतीय नागरिकांना पोलिसांनी आश्रय स्थळी पाठविले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक Nl.01 AE.0418 व MP.09.GG.5977 हे मुंबई च्या दिशेने उत्तरभारतात जात असताना गरवारे पॉईंट नजीक असलेल्या उड्डाणपूल जवळच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नाकेबंदीजवळ संशयित वाहन पोलिसांनी अडविले.
यामध्ये जवळपास 67 लोक प्रवास करीत असताना आढळून आले. यावर कारवाई करत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत या ट्रक मधील प्रवाश्यांना अंबड गावातील सावित्री बई फुले मनपा प्राथमिक विद्यालयात मनपा शाळा क्रमांक ७८ येथे आश्रयासाठी पाठविले.
दरम्यान, पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक GJ.15.AT.2950, HR.56.B.6446, MH43.BF.6928 या तीनही गाड्या मुंबई हून कामगार घेऊन नाशिकच्या दिशेने उत्तर भारतात जात असताना गरवारे पॉईंट येथे पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यामध्ये अवैध प्रवास वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान, याठिकाणी गाडी थांबवून मनपाच्या कोरोना कक्षाला माहिती देण्यात आली.
त्यानंतर मनपाच्या वैद्यकीय पथक त्या ठिकाणी हजर होऊन येथील सर्व प्रवाशांची तपासणी केली. त्यानंतर या ट्रकांमधील २९१ प्रवाश्यांना सुखदेव आश्रम विल्लोळी तसेच ३०० प्रवाशांना समाजकल्याण वस्ती गृह नाशिक पुणे रोड येथे स्थलांतरित करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनातर्फे व सेवाभावी संस्थेतर्फे चहा पाण्याची व जेवणाची प्राथमिक व्यवस्था करण्यात आली. यावेळी पुलिस उपायुक्त विजय खरात सहायक आयुक्त मांगळसिंग सूर्यवंशी, समीर शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, हरिसिंग पावरा, आदीसह अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले होते.




