मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मान्सूनचे वारे पूर्णपणे सक्रिय झाले आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर पावसाला सुरवात झाली आहे. त्यानुसार, पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने विशेषतः मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, अवघ्या २४ तासांत २०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील ७२ तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे.
हवामान विभागाचे अधिकारी एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसासाठी पूरक परिस्थिती असून, राज्याच्या इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मुंबई रायगड, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यात तसेच सातारा या भागात रेड अलर्ट असणार आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या पद्धतीने पडत आहे. सध्या घाटमाथा आणि कोकणकिनारपट्टीवर पावसाची चांगली स्थिती आहे. ६ जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी दिली.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. हा इशारा ‘Very Likely’ म्हणजेच अत्यंत शक्य असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.




