Monday, July 27, 2026
Homeराजकीयधर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दिल्ली । Delhi

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी, २५ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलनाचा सामना करत असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी पद सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. या घडामोडीनंतर शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियाद्वारे अधिकृत विधान जारी करत राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून, भाजपसाठी देशाची तरुण पिढी ही कोणत्याही राजकीय पदापेक्षा महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

गृहमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी देश, आपली तरुण पिढी आणि विद्यार्थी हे कोणत्याही पदापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा दिलेला त्याग हे याच मूल्यांचे उत्तम उदाहरण आहे. मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा सदैव आदर करते आणि पेपरफुटीसारख्या गंभीर समस्या कायमच्या रोखण्यासाठी सर्व आवश्यक प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करताना अमित शाह म्हणाले, “नीट पेपरफुटी प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील, त्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेले निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहेत. या ठोस पावलांमुळे परीक्षेत कठोर परिश्रमाने यशस्वी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्ण न्याय मिळेल, असा मला दृढ विश्वास आहे.”

राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचा गौरव करताना गृहमंत्र्यांनी त्यांच्या कामगिरीचा पाढा वाचला. “आपल्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अतिशय प्रभावी अंमलबजावणी केली. विद्यार्थ्यांसाठी मातृभाषेत परीक्षा देण्याची सोय, ‘पीएम श्री’ शाळांची निर्मिती, डिजिटल शिक्षणाचा विस्तार आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योग व शिक्षण क्षेत्राची सांगड घालण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली,” असे शाह यांनी नमूद केले.

परीक्षा पद्धत अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित बनवण्यासाठी प्रधानांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगत गृहमंत्र्यांनी जोडले की, भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने त्यांनी दाखवलेली निष्ठा नेहमीच स्मरणात राहील. दरम्यान, गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र विरोध आणि आंदोलनानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आल्याने देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​’गट्ट्या’ची हुलकावणी संपली! चोरी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik रेकॉर्डवरील पसार संशयितांचा (Suspected) शोध घेण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक शहर गुन्हेशाखा (Nashik City Unit) युनिट-२ च्या पथकाने कारवाई...