Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकबुतरांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत

कबुतरांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -


कबुतरांची पिसे, विष्ठा आदींचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून नगर विकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे येथील संचालक विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचे नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे हे सदस्य सचिव आहेत. या समितीत सदस्य म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसिन एम्स नागपूरचे डॉ. प्रदीप देशमुख , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे सचिव एस. के. दत्ता,  फुफ्फुस तज्ज्ञ सुजित रंजन, डॉ. अमिता आठवले, आयसीएमआर, रोगप्रतिकारशक्ती तज्ज्ञ, डॉ. मनीषा मडकईकर, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आर. जे. झेंडे, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे जे रुग्णालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा पाटील, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांचा समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य दिल्यामुळे होणाऱ्या आरोग्य परिणामांचा अभ्यास, कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा सविस्तर आढावा, कबुतरांना नियंत्रित पद्धतीने अन्न देणे शक्य आहे का याची तपासणी करणे, आवश्यकता भासल्यास नियमावली तयार करणे अशी कार्यकक्षा या समितीला आखून दिली आहे.

समितीने पहिल्या बैठकीपासून ३० दिवसांच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करणे अपेक्षित आहे. हा निर्णय राज्यातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून, लवकरच समिती प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहे.

ताज्या बातम्या