मुंबई | प्रतिनिधी Mumbai
लाडकी बहीण, लाडका भाऊ पाठोपाठ आता ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना राज्य सरकारने खूष केले आहे. आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकार राज्यातील ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रूपये सन्मान निधी म्हणून देणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी या सन्मान निधीबाबत घोषणा केली.
ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज महामंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यावेळी सरनाईक यांनी ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रूपये सन्मान निधी देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी बैठकीत व्यक्त केला.
तत्कालीन मुख्यमंत्री अंक आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. भविष्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी राबविण्यात येतील. तसेच मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविण्याचे विचाराधीन असून त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे. कर्तव्यवर असताना एखादा चालकाला दुखापत झाल्यास त्याला मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.