Friday, May 17, 2024
Homeब्लॉगनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा प्रेरणादायी शिक्षण प्रवास

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा प्रेरणादायी शिक्षण प्रवास

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेला आज (१ मे) १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली स्वदेशीची चळवळ, ही लोकजागृतीच्या दृष्टीने महत्वाची चळवळ होती. या चळवळीत स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुःसूत्रीचा स्वीकार देशभर करण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उ‌द्देशाने महाराष्ट्रात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ नावाने अनेक शाळा सुरू झाल्या. त्या काळी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ हा जणू काही ‘ब्रँड’ होता. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेल्या व फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेऊन आलेल्या नाशिकमधील कै. शि. रा. कळवणकर, गुरुवर्य कै. रं. कृ. यार्दी, कै. ल. पां. सोमण, कै. शि. अ. अध्यापक यांनी कै. वा. वि. पाराशरे यांच्या मदतीने १ मे १९१८ ला ‘न्यू इंग्लिश स्कूल’ नावाने शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात शाळा सुरु केली. त्याच वेळी या ध्येयवादी व शिक्षणप्रेमी तरुणांनी अर्थात संस्थेच्या संस्थापकांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उ‌द्देशाने, राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवण्यासाठी व ब्रिटिशांविरोधात लढणारा तरुणवर्ग निर्माण व्हावा हा त्यामुले उद्देश होता.

- Advertisement -

संस्थेचा प्रारंभकाळ

कर्डिले वाड्यात शाळा सुरु झाली, तेव्हा सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग होते. समाजाचा कल मुलांना राष्ट्रीय शाळेत प्रवेश घेण्याकडे वाढू लागला. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांची संख्या झपाट्‌याने वाढू लागली. त्यामुळे १९१९ साली शाळा शिंदेकर वाड्यात भरू लागली. १९२० साली राजेबहा‌दूर वाड्‌यात शाळा स्थलांतरित झाली. सर्व संस्थापक सदस्य संस्थेच्या विकासाबरोबर अध्यापनाचेही कार्य करीत. खऱ्या अर्थाने ते लोकशिक्षक होते. १९२४ मध्ये श्रीमंत माधवराव देशपांडे यांच्या उदार देणगीमुळे शाळेसाठी जागा खरेदी करण्यात आली. या जागेवर १९३२ ला चौदा खोल्यांची इमारत बांधली गेली. यासाठी वाडिया ट्रस्ट आणि सुरगाणा संस्थानप्रमुखांनी मदत केली. १९३८ मध्ये शाळेसाठी भव्य व नवीन इमारत बांधली गेली. इमारतीचे उ‌द्घाटन तत्कालीन मंत्री जी.व्ही. मावळणकर यांच्या हस्ते झाले. एक हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, अशी व्यवस्था संस्थेने केली. नव्या इमारत बांधकामामुळे मंडळावर आर्थिक जबादारी येऊन पडली होती. अशावेळी १९४३ मध्ये मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी शेठ विलासराय रुंगटा व गोविंदराय रुंगटा बंधूंनी आपल्या वडिलांच्या नावाने उदार देणगी दिली. जुलै १९४३ मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’चे ‘जुहारमल सरुपचंद रुंगटा हायस्कूल’ असे नामकरण झाले. हेच सध्याचे सध्याचे जु. स. रुंगटा हायस्कूल होय. संस्थेचा हा प्रारंभिक काळ सर्वांनाच प्रेरणादायी आहे. संस्थेबरोबरच रुंगटा हायस्कूललाही आज १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. शतकोत्तर वाटचालीत आजही संस्था अभ्यासक्रमाबरोबर राष्ट्रीयत्व व देशभक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. यासाठी विविध उपक्रम, व्याख्याने, प्रदर्शने, स्पर्धांचे आयोजन केले जाते.

संस्थेचा कार्यविस्तार

‘संहतीः कार्यसाधिका’ म्हणजेच ऐक्याने कार्य साधते. संस्थेच्या या ब्रीदवाक्याप्रमाणे स्थापनेपासून आजवर होऊन गेलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, शाळेचे सर्व घटक यांचे अथक परिश्रम व एकत्रित प्रयत्नाने तसेच समाजाच्या सहाय्याने संस्थेचा कार्यविस्तार नाशिक जिल्ह्यात शहर ते अतिग्रामीण भागापर्यंत झाला आहे. सध्यस्थितीत संस्था प्रामुख्याने नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव येथील संकुलांमध्ये पूर्वप्राथमिकपासून महावि‌द्यालयीन शिक्षणापर्यंत ५१ शैक्षणिक केंद्रांत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. संस्थेने नाशिक व सिन्नर येथे नुकतेच कला व वाणिज्य महावि‌द्यालये सुरु केली आहेत. औ‌द्योगिक क्षेत्रासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन नाशिक व सिन्नर येथे संस्थेने औ‌द्योगिक प्रशिक्षण केंद्रे आयटीआय सुरु केली आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सिन्नर येथे विविध कोर्सेस विनामूल्य सुरु केले आहेत. नाशिक येथे युवकांसाठी स्वावलंबी भारत अभियानअंतर्गत उ‌द्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने नाशिक येथे बीबीए, बीसीए व बी. एस्सी कम्प्युटर सायन्स हे कोर्सेस लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. कष्टकरी व नोकरीनिमित्ताने दिवसा शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी संस्था गेली ७० वर्षे रात्र शाळा चालवत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नाशिकरोड येथे संस्थेने रात्र महावि‌द्यालय सुरु केले आहे. भविष्यात उच्च तंत्र शिक्षण व आरोग्य क्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास संस्था प्रयत्नशील राहील.

संस्थेचे उपक्रम

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा व तो सुजाण नागरिक बनावा, त्यांच्यात सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचे बीजारोपण व्हावे यासाठी संस्था गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. त्यात प्रामुख्याने कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा, कै. खंडेराव लेले सूर्यनमस्कार स्पर्धा, विविध वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव, कृतज्ञता सोहळा, वि‌द्यार्थी गुणगौरव सोहळा, संस्कृती ज्ञान परीक्षा, शिवचरित्र परीक्षा अशा विविध उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करीत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गुरुवर्य कै. रं. कृ. यादी स्मृती व्याख्यानमाला व कै. सुमनताई बर्वे स्मृती व्याख्यान यांचे दरवर्षी आयोजन करते. सर सी. व्ही. रमण अकादमीतून संस्थेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ७ वि‌द्यार्थ्यांना तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत २१ वि‌द्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही दरवर्षी विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत आहे. संस्थेने २००६ पासून केंब्रिज वि‌द्यापीठाशी संलग्न असणारा फंक्शनल इंग्लिश कोर्स संस्थेच्या विविध शाळांमध्ये सुरू केला आहे. संस्कारक्षम शिक्षणाबरोबर त्यात आधुनिकताही आणण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. नाशिकरोड येथील शाळांमध्ये ‘डिजीटल क्लासरूम’ तयार केले आहेत. इतर संकुलांतही असे क्लासरूमस् तयार केले जाणार आहेत. संस्थेच्या सर्व शाळा संस्था मुख्यालयाशी इंटरनेटने जोडलेल्या आहेत. संस्था डिजिटल कामकाजावर भर देत आहे. यासाठी संस्थेची संगणक अकादमी कार्यरत आहे. त्याद्वारे जिल्हास्तरावर ‘कॉम्पूटलेन्ट’ स्पर्धा परीक्षा घेतली जाते. संस्थेच्या शाळांव्यतिरिक्त इतर संस्थांचेही हजारो विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केंद्र शासनाच्या अनुदानातून अटल टिंकरीग लॅब नाशिक, नाशिकरोड, इगतपुरी येथील माध्यमिक शाळांमध्ये सुरु झाल्या आहेत. सिन्नर येथेही लवकरच सुरु होणार आहे. अटल लॅबमधून विद्यार्थ्यांना संगणकाचे आधुनिक ज्ञान दिले जात आहे. डिजीटल युगात संस्थेतील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानात मागे राहू नये म्हणून आयओटीसारखे (इंटरनेट ऑफ थिंग्स) उपक्रम सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेने क्रीडा प्रबोधिनी सुरू केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीतून टेनिस, व्हॉलीबॉल, कॅरम, ज्युदो, कुस्ती, खोखो, कबड्‌डी, बु‌द्धिबळ, मल्लखांब, आदी विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्रीडा प्रबोधिनीमुळे संस्थेतील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे माजी अध्यक्ष कै. द.शं. तथा काका नाईक यांच्या प्रेरणेने ‘ज्ञानयात्री’ त्रैमासिक २००८ पासून सुरु आहे. संस्था व शाळास्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्वाना व्हावी व विद्यार्थी, शिक्षक यांच्या लेखन कलेला प्रोत्साहन त्यांच्या विचारांना व्यासपीठ असावे यासाठी हे त्रैमासिक सुरु केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी संस्थेने प्राथमिक तयारीही सुरु केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी बालवाडी व प्राथमिक स्तरावर सुरुवातीला होणार असल्याने, त्या दृष्टीने संस्था विद्याभारतीच्या सहाय्याने शिक्षकांच्या कार्यशाळा व कृतीसत्रांचे आयोजन करीत असते. शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या विविध समित्यांमध्ये संस्थेचे सदस्य व शिक्षक कार्यरत आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती समिती व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजे ‘बालभारती’ अभ्यास मंडळ सदस्य म्हणून संस्थेच्या सदस्य व शिक्षकांची शासनाने नियुक्ती केली आहे. संस्थेच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे.

माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा

संस्थेला माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या माजी विद्यार्थ्यांत कविवर्य कुसुमाग्रज, माधव मनोहर, दत्ता भट, शिवाजी तुपे, बापू नाडकर्णी, माजी खासदार गो. ह. देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, खासदार उत्तमराव ढिकले, अभिनेते गिरीश ओक, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रमेश रासकर (एमआयटी लॅब, बोस्टन), ब्रिगेडियर योगेश कुलकर्णी यांसारखे अनेक सन्माननीय व प्रतिथयश माजी विद्यार्थी आहेत. माजी वि‌द्यार्थी बाह्य जगात एक प्रकारे संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. समाजात संस्थेची प्रतिष्ठा वृ‌द्धिंगत करतात. त्यांचे यश वर्तमान वि‌द्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

मान्यवरांच्या भेटी

संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना, उपक्रमांना मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी रेल्वेमंत्री स. का. पाटील, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी, सेतुमाधवराव पगडी, शंकर अभ्यंकर, यु. म. पठाण, शांताबाई किर्लोस्कर, रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, प‌द्मश्री गिरीश प्रभुणे, प‌द्मश्री भिकूजी तथा दादा इदाते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कवी प्रवीण दवणे यांसारख्या अनेक मान्यवरांचा उल्लेख करता येईल.

‘ज्ञानं परमं बलम्।’ ज्ञान हे सर्वोच्च बळ आहे. वि‌द्यार्थ्यांचे भविष्यातील जीवन समृद्ध होईल, असे शिक्षण देऊन तो देशाचा आदर्श नागरिक बनेल यासाठी संस्था कटिबद्ध आहे. संस्थेचा हा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. संस्थेची ही यशस्वी व उज्ज्वल परंपरा कायम टिकवून, संस्था काळानुसार शिक्षणातील बदल स्वीकारून प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल, असा विश्वास आहे.

अश्विनीकुमार भानुदास येवला (सेक्रेटरी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक)
- Advertisment -

ताज्या बातम्या