मुंबई | Mumbai
नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. या निकालावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. नाशिकला अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना आम्ही मदत केली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत यांनी म्हटले की, शाह सेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. नाशिकची उमेदवारी मागे घेतली तरीही लोकांनी कसे मतदान केले, हा चमत्कारच म्हणावा लागेल. हे सगळे शिंदे गटाचे आणि भाजपाचे मतदार ठाण्यात सुरक्षित ठेवले होते. आपल्या सर्वांनी माहिती आहे की, एकनाथ शिंदे यांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते.
संजय राऊत म्हणाले की, “गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. असे असले तरी महायुतीच्या मतदारांनी त्यांना मतदान कसे काय केलं? या सगळ्या मतदारांना ठाण्यात ठेवण्यात आले होते, तरीही त्यांनी विरोधात मतदान केले. याचा अर्थ भाजपच्या सगळ्या मतदारांनी गोकुळ गिते यांना मतदान केलं.”
गोकुळ गिते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितलं. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना मदत केली, त्याचा गोकुळ गितेंना फायदा झाला, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिंदेंचा एक उमेदवार भाजपने पाडला. याला उद्गेक म्हणू शकता. यामध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. धमक्या देऊनही मतदारांनी शिंदेंच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले, असेही संजय राऊत म्हणाले.




