मुंबई / प्रतिनिधी Mumbai
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी ना मिळाल्याने नाराज झालेल्या माजी खासदार आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पक्षाच्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली. राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले परांजपे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशानंतर परांजपे यांची एका प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने परांजपे हे नाराज होते. शिवाय पक्षातील अंतर्गत घडामोडीमुळे ते राष्ट्रवादीत अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र परांजपे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना दिले आहे. परांजपे यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता आणि ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक अशी पदे होती. परांजपे यांच्या राजीनाम्याने पक्षातील नाराजी समोर आली आहे.
मध्यंतरी परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. परांजपे यांचे मूळ शिवसेनेत होते. त्यांचे वडील प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. वडिलांच्या निधनानंतर आनंद परांजपे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मधल्या काळात शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाशी बिनसल्याने त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर परांजपे यांनी अजित पवार यांना साथ दिली. मात्र त्यानंतरही विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी न मिळाल्याने त्यांनी अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.




