श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
आकारी पडीत जमिनी मुळ वारसांना परत करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेशानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊनही राज्यपाल महोदयांचे एका स्वाक्षरीमुळे अन् जमिनी वाटपात सरकारमधील एका राजकीय नेत्यांचा खूप फायदा होणार हा गैरसमज करून दिल्याने हा प्रश्न प्रलंबीत ठेवला आहे. या शांततेच्या अन् कायदेशीर आंदोलनाने निश्चित यश पदरात पडणार आहे. रात्री 8.30 ला उशीराने आलेल्या शिष्टमंडळाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणली.
या चर्चेत 23 तारखेपर्यंत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्याचे लेखीपत्र देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण जेलभरो आंदोलन स्थगित करत असल्याचे आंदोलकांचे नेते अॅड. अजित काळे यांनी जाहीर केले. शेती महामंडळाच्या हरेगाव मळा कार्यक्षेत्रातील 9 गावे आकारी पडीत कृती समितीचे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे आवारात काल सकाळपासून जेलभरो आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनात हजारो महिला-पुरुष सहभागी झाले. काही शेतकरी दुभत्या गायी, मेंढ्या समवेत होते. सायंकाळी 7 च्या सुमारास आंदोलक शेतकर्यांसमोर बोलताना अॅड. काळे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. तरी आठ आठवड्यांत जमिनी वाटपाचा निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले होते.
पुढे विधानसभा निवडणुका होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. 9 गावातील आकारी पडीत शेतकर्यांना जमिनी वाटप करण्यासाठी मदत करणारे त्यावेळचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आले. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ना.विखे पाटील समवेत आपण अनेकदा भेट घेतली. परंतू महसूलमंत्री महोदयांनी जमिनी परत करण्याचा निर्णय न घेता 4 हजार एकर जमिनी उद्योगांसाठी देण्याचा निर्णय घेतला. म्हणून सरकारला आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही शांततेच्या मार्गाने टप्याटप्याने आंदोलन करत आहोत असे अॅड.काळे म्हणाले.
सकाळपासून आंदोलक महिलांनी जागोजागी चुली पेटवून सर्व हजारो आंदोलकांना पिठलं भाकरी स्वयंपाक तयार केला. सायंकाळी पाच वाजता गायीचे दूध काढून चहा तयार करण्यात आला. या आंदोलना दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी भ्रमणध्वनीव्दारे पाठिंबा व्यक्त केला. सायंकाळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब बकाल, शरद आसणे, सचिन वेताळ, रूपेश काले, प्रभाकर कांबळे, विठ्ठलराव शेळके, कार्लस साठे, राजेंद्र पाऊलबुध्दे सुरेश ताके, दिलीप गलांडे, निलेश शेंडगे, सुनिता वेताळ, ललिता आढाव, संतोष वाकचौरे, शिवाजी रूपटक्के, अॅड. अभिजित काळे, गोविंद वाघ, साहेबराव चोरमल, डॉ.रोहीत कुलकर्णी, चंद्रभान वाघ, दिलीप रूपटक्के, शिंदे, सोपानराव नाईक, अॅड. सर्जेराव घोडे, दत्तात्रय मुठे, संभाजी ब्रिगेडचे उत्तर जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सरपंच सागर मुठे यांची भाषणे झाली. या आंदोलनास 9 गावातील महिला-पुरुष शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आंदोलन यशस्वी झाले.
महसूल सहसचिवांच्या पत्राची होळी
काल सकाळी जेलभरो आंदोलन सुरू झाल्यानंतर महसूल व पोलीस विभागाच्यावतीने शेतकरी कृती समितीचे नावाने महसूल सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या सहीने आंदोलन मागे घेण्यासंदर्भात पत्र आले. या पत्रात 4 हजार एकर जमीन उद्योगास देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत आपल्या आकारी पडीत जमिनी संदर्भात विषय घेण्यात येईल, असा उल्लेख केल्याने. या त्रिसदस्यीय समिती अन् आमचा संबंध काय? असा सवाल करत आंदोलकांनी या पत्राची होळी करत निषेध केला.
1 मे ला शेतात कब्जा आंदोलन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठविलेल्या शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, नगरपालिका गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक दिपक चव्हाण यांचा समावेश होता. नितीन दिनकर यांनी आंदोलकासमोर ना.विखे पाटील यांच्याशी अॅड. अजित काळे यांची चर्चा करून दिली. या चर्चेत 23 तारखेला महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत बैठक लावण्याचे निश्चित करण्यात आले. अशा आशयाचे लेखी पत्र जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत पाठवणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या बैठकीत तोडगा निघाला नाही. तर 1 मे ला कब्जा आंदोलन करण्यात येणार असल्याचे अॅड. अजित काळे यांनी सांगितले.




