मुंबई । Mumbai
नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती सुरू असलेल्या तपासात आता राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत खरातच्या मोबाईल संभाषणाचा सविस्तर तपशील (Call Data Record) जाहीर केला. यामध्ये अनेक बड्या राजकारण्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी खरातशी तासनतास संवाद साधल्याचा दावा दमानिया यांनी केला असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, १ एप्रिल ते १७ मार्च या अल्प कालावधीत अनेक दिग्गज नेते खरातच्या संपर्कात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव आघाडीवर आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार, चाकणकर यांनी खरातला तब्बल १७७ फोन केले होते. विशेष म्हणजे एका दिवशी त्यांच्यात सलग २२ मिनिटे संभाषण झाले आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा अशा भोंदूबाबाच्या इतक्या घनिष्ट संपर्कात कशा, असा सवाल उपस्थित करत दमानिया यांनी चाकणकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
या यादीत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचेही नाव पाहून आपल्याला दुःख झाल्याचे दमानिया यांनी नमूद केले. खरात याला मोठे करण्यात केवळ अंधश्रद्धा नसून राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पाठबळ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही नेते केवळ भविष्य विचारण्यासाठी गेले असतील, मात्र काही जणांनी खरातच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात एसआयटीने (SIT) अद्याप रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी का बोलावले नाही, असा प्रश्न उपस्थित करत त्या स्वतः एसआयटीकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दमानिया यांनी जाहीर केलेल्या खरातच्या कॉल लिस्टमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची आणि त्यांच्या निकटवर्तीयांची नावे आहेत. यामध्ये नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, त्यांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्ररमधून निवडणुकीला उभे राहिलेले उदय सांगळे, विधानपरिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, भुसे यांचे पीए रामदास खेडकर, विखे पाटलांचे ओएसडी खताडे, सुनील तटकरे यांचा उल्लेख होता. दीपक केसरकर यांनी 19 कॉल केले होते असं त्यांनी सांगितलं. तसेच श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांचे नावही पुढे आले. संदीप निमसे सन 2018 मध्ये श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2021 ते 25 या कालावधीत नांदेड येथे पदोन्नतीवर सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्त होते. जून 2025 मध्ये ते पुन्हा श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालयात रूजू झाले. त्यांचे भोंदू खरातशी अनेक कॉल झाल्याचे दमानिया स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, “जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नाव वाचून दु:ख झालं. त्यांना अशा बाबाकडे भविष्य विचारण्यासाठी कोण घेऊन गेलं माहिती नाही. मला ती व्यक्ती आतापर्यंत चांगली वाटायची”.
चाकणकांनी फेसबुक पोस्ट केली असून, मीडिया ट्रायल सुरु असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडेंप्रमाणे मीडियातून गायब आहेत असं त्या म्हणाल्या. “चाकणकर कुटुंबियांतील सर्वांनी फोनवरुन खरातशी संपर्क साधला होता. रुपाली चाकणकर, मुलगा सोहम, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल, संकेत या सर्वांचे कॉल यादीत सापडलले आहेत. 1 एप्रिल ते 17 मार्चच्या कॉल डेटानुसार, रूपाली चाकणकर यांनी 177 कॅाल केले. त्यातल इनकमिंग 119 व आऊटगोंईंग 58 आहेत. 17 मार्चला अशोक खरातचा फोन बंद होईपर्यंत बोलत होत्या. एक कॅाल तर 22 मिनिटांचा आहे. नेमक्या कसल्या गप्पा मारत होत्या?,” अशी विचारणा अंजली दमानियांनी केली आहे.
“टॅाप दहा फोन नंबर ज्यांनी सर्वात जास्त वेळ खरातशी बोलले त्यात त्याची मुलगी तृप्ती पहिल्या नंबरवर व दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहेत. त्या 33 हजार 727 सेकंद बोलल्या. जर काही काम नव्हतं, संस्थेचं काम करत होता तर तुम्ही तर टॉपच्या दुसऱ्या क्रमांकावर कशा? 30 सेकंदाचे कॉल समजू शकले असते. नंतर तिसऱ्या नंबरवर दिपक लोंढे, मग पत्नी कल्पना आहे. दिपक लोंढे केसरकरांचे जवळचे आहेत. ज्यांचे 189 कॅाल आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.





