शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भोंदू अशोक खरात प्रकरणात महसूल विभागातील ज्या अधिकार्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग समोर येईल, त्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल, असा कडक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत दिला. 1992 पासून आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त साई दर्शनाला येण्याची परंपरा कायम राखत, रविवारी त्यांनी सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले, जमिनींची बेकायदेशीर खरेदी-विक्री, जमीन लाटणे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये महसूल विभागातील काही अधिकार्यांची नावे येत आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू असून त्याचा अंतिम अहवाल लवकरच सादर होणार आहे. अहवालात दोषी आढळणार्या कोणत्याही अधिकार्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर बोलताना त्यांनी नागरिकांच्या निवेदनांची तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले. विशेषतः ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केले. पुढील चार वर्षांत राज्यातील 80 टक्के शेतकर्यांचे पाणंद रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून, गेल्या सात महिन्यांत अनेक रस्त्यांना अधिकृत क्रमांक देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.





