बारामती | Baramati
बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सांगता सभेला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबोधन केले. यावेळी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घालत विक्रमी मतदान करत दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. दादा जरी गेले असले तरी त्यांची स्वप्ने अजूनही जिवंत आहेत, तीच स्वप्न पूर्ण करण्याचे काम मी करेन, बारामतीकरांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले.
“अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. पण, हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. त्यांनी विकसित केलेल्या बारामतीला देशात एक नंबरचा तालुका बनवणे हे स्वप्न होते. ते आपल्याला मिळून पूर्ण करायचे आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी थांबणार नाही, खचणार नाही आणि हटणार नाही
“दादा जरी गेले तरी त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मात्र त्यांच्या विचाराचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी खचणार नाही. “मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येशूबाई, अहिल्याबाई जशा लढल्या, त्याप्रमाणे मी तुमची सेवा करेन. शिव-शाहू-फुले यांचे विचार पुढे नेण्याचे मी काम करेन. बारामतीकर कुटुंब मानून मी पुढे काम करेन. मी थांबणार नाही, खचणार नाही आणि हटणार नाही. बारामतीची माणसे हीच माझी खरी ताकद आहे.” असे त्या यावेळी म्हणाल्या.
लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या
“माझं दुःख मोठे आहे. माझे तर सर्वस्व हरवले आहे. पण, लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुम्हा सर्वांच्या आधारावर पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे.” असे म्हणत भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
हा जनसागर म्हणजे अजित पवारांविषयी असलेला सन्मान आणि प्रेम
पाठिंबा दिलेल्या सर्व संस्थाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त करते. शरद पवारांच्या दुरदृष्टीतून पाया रचला आणि अजित पवारांनी यावर कळस चढवला. या मैदानाला संघर्षाची, एकजुटीची परंपरा आहे. याच प्रांगणात अजित पवारांचा नागरी सत्कार झाला आहे. हा जनसागर म्हणजे अजित पवारांविषयी असलेला सन्मान आणि प्रेम आहे,” असे म्हणत त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले.
जशा तुमच्या मनात शंका आहे तशाच माझ्यादेखील मनात आहे
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “दादांच्या अपघाताबाबत जशा तुमच्या मनात शंका आहेत तशाच माझ्यादेखील मनात आहेत. देवेंद्र फडणवीसांनीदेखील यावर विधानसभेत आश्वासन दिले. दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच माझीदेखील ठाम भूमिका आहे. त्यामुळेच मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन विनंती केली आहे. काही चुकीचे आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा ही व्हायलच हवी. त्यासाठी मी प्रयत्न करेन.”





