मुंबई | Mumbai
निवडणूक आयोगाने बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि राहुरीची निवडणूक लागलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना विधानसभा अथवा विधानपरिषदेपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक त्या लढविणार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बनला मृत्यूचा सापळा; आयसीयूतील आगीत १० रुग्णांचा मृत्यू
शिवसेनेची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे विधिमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा होईल. त्यानंतर एकत्रित निर्णय घेतला जाईल. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यातला विरोध शब्द महत्त्वाचा आहे. अजित पवार यांच्याविषयी सद्भाव, सहानुभूती आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता, तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याचे काय?, असे संजय राऊत म्हणाले.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, विषयच येत नाही. मी याआधी सांगितले आहे की, सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्न येत नाही. महाविकास आघाडीची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. परंतु, संजय राऊत यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.





