
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम भारतावर दिसून येत आहे. त्यामुळे देशात मान्सून लांबणीवर पडला आहे. १९५० नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक तीव्र स्वरूपाचा एल निनो राहण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतात या एल निनोचे गंभीर परिणाम बघायला मिळतील. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल निनोच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संकटांकडे लक्ष वेधले आहे. राज्यांनी जलसंधारणासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीदरम्यान हवामानाशी संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी देशाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या ११वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक पार पडली. सर्व २८ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी याला उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी संभाव्य हवामान संकटांकडे लक्ष वेधले.
पूर्वतयारी आणि संसाधनांचे दीर्घकालीन नियोजन करणे
हवामानातील बदलांमुळे शेती, जलसाठे आणि उपजीविकेसमोर मोठी आव्हाने उभी राहू शकतात; त्यामुळे पूर्वतयारी आणि संसाधनांचे दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान मोदी यांनी मांडले. सरकारच्या निवेदनानुसार, पंतप्रधानांनी विशेषतः एल निनो परिस्थितीच्या संभाव्य प्रभावाविषयी सावध राहण्याचा इशारा दिला आणि राज्यांनी जलसंधारणांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले.
१९५० नंतरचा सर्वात तीव्र एल निनो
यंदा १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असा अंदाज देखील आहे. २०२७ च्या पूर्वार्धातही ‘एल निनो’सक्रिय असेल असा कयास बांधला जात आहे. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन (सीपीसी) सेंटरने गुरुवारी केली. डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून, यंदाचा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता सीपीसीने वर्तवली आहे.
एल निनो म्हणजे काय?
एल निनो ही मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेळोवेळी वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत करण्याशी संबंधित आहे. कारण एल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतात पाऊस कमी पडतो.
एल निनोचे वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे तीव्र, अतितीव्र जसा मध्ये आपण सुपर एल निनो असं पण एक संज्ञा वापरली जात होती. अतितीव्र स्वरूपामध्ये म्हणजे तिथलं तापमान हे सरासरी पेक्षा दोन ते अडीच अंशापर्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तीन अंशापर्यंत पर्यंत राहू शकत त्या त्यापेक्षा पण जास्त राहू शकत पण सीपीसीच्या अंदाजामध्ये तसं दाखवण्यात आलेल नाही, पण तरी सुद्धा 1950 पासूनचा हा सर्वात तीव्र एल निनो राहण्याची शक्यता आहे.




