
मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ मध्ये हत्या (Santosh Deshmukh murder case) करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या बीड कारागृहात असून, त्यांच्यावरील खटला चालू आहे. संतोष देशमुख यांच्या निधनानंतर मस्साजोग गावच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) उभ्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असून, त्यांच्याविरोधात स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार (Voter) माझ्यासोबत आहेत. त्यांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केले आहे. कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. मी अगोदरही संतोष देशमुखांसाठीच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, इथून पुढेही या लढाईत मी असेन. हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे. आगामी काळात गावातील आपली कामे कोण करु शकतो हे जनतेने लक्षात घेतले आणि मला मतदान केले”, अशी प्रतिक्रिया स्वरुपानंद देशमुख (Swarupanand Deshmukh) यांनी दिली.
अश्विनी देशमुखांचा किती मतांनी पराभव
स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांचा ९२ मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली. मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी एकूण मतदान १७४४ इतके मतदान झाले होते. यात स्वरूपानंद देशमुख यांना ९१४ तर अश्विनी देशमुख यांना ८२२ मते मिळाली. तर नोटाला ८ मते पडली. यामुळे स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी झाले. या निवडणुकीसाठी ८४ टक्के मतदान झाले होते.
गेल्यावेळी नऊ मतांनी झाला होता पराभव
मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरुपानंद देशमुख यांचा दिवंगत संतोष देशमुख यांनी नऊ मतांनी पराभव केला होता. या पराभवाची परतफेड स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा हरवून केली आहे. या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख ९२ मतांनी निवडून आले आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले होते. मात्र, स्वरुपानंद देशमुख शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम होते. यावरुन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नाराजीही व्यक्त केली होती. या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे.




