लोणी |वार्ताहर| Loni
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष केवळ एक उत्सव नसून, ते सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावर ठसा उमटवणारे ठरावे, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
विधानभवनात आयोजित विशेष बैठकीत भंडारदरा शताब्दी महोत्सवाच्या सर्वंकष कृती आराखड्याचा आढावा घेताना त्यांनी वर्षभर चालणार्या उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमातून धरणाचे सुशोभीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. ना. विखे पाटील म्हणाले, या धरणामुळे जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शने आणि सादरीकरणे केली जावीत. तसेच महोत्सवासाठी स्वतंत्र लोगो आणि वेबसाईट तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा जगभर प्रचार करावा, जेणेकरून मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतील.
स्थानिक कलाकारांना संधी आणि रोजगाराला प्राधान्य देण्याचे निर्देश देत त्यांनी सांगितले, महोत्सवांतर्गत प्रत्येक महिन्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यामध्ये पाण्यावर आधारित साहसी खेळ, लोककला आणि धरणापासून ते शेवटच्या चारीपर्यंतच्या लाभक्षेत्राचा सहभाग असणारे उपक्रम राबवले जातील. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लवकरच हा अंतिम आराखडा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.





