Friday, May 3, 2024
Homeराजकीयनैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण...

नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र सरकार मधील महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कामावर असलेल्या पोलिसाला थप्पड मारल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?.” दरम्यान, यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली असून भाजपने त्यांंच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

राजीनाम्याच्या मागणीवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

या सगळ्या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल’, असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या.

भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, ‘एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.’

- Advertisment -

ताज्या बातम्या