नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्रात (Maharashtra) स्थापन झालेली महाविकास आघाडी आता केवळ नावाला उरली आहे. या महापालिका निवडणुकीत तिचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत आज भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वताने आजपासून नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या वार्तांकनासाठी मिडिया सेंटर सुरु करण्यात आले, असून त्याचे उद्घाटन उपाध्ये यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रवक्ते अजित चव्हाण,विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, नाना शिलेदार, सुनील देसाई, गोविंद बोरसे पियु अमृतकर उपस्थित होते.
उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aaghadi) कोणताही ठोस विचार नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यांच्याकडे कोणतेही वैचारिक अधिष्ठान नव्हते. त्यामुळेच यंदा तर त्यांच्यातून काँग्रेस बाहेर पडून फुटली आहे. या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दिसणार आहे. आम्ही या निवडणुकीत महायुतीचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक पातळीवर काही अडचणी आल्या. पंरतु, वरीष्ठ पातळीवर एकमत कायम आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, आम्ही या निवडणुकीत (Election) मित्र पक्षावर टिका करणार नाही. विकास याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल. तसेच त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी लवकरच दूर होईल. येत्या दहा दिवसात केवळ महापालिका निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केले जाईल. पक्षांतर्गत नाराजी राहणार नाही. ज्यांनी रोष व्यक्त केला ती साहजिक प्रतिक्रिया होती. घरातील वाद होता, तो आता मिटला आहे. असेही केशव उपाध्ये यांनी सांगितले.
दरम्यान, आज मीडिया सेंटरचे (Media Centre) उदघाटन झाले असले तरी बहुमतांशी पदाधिकारी तसेच आमदारांनीही त्याकडे पाठ फिरवल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. कारण यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत उद्घाटन करतांना मोठी गर्दी होत असे. मात्र, यंदा ती रौणक दिसली नाही. त्यामुळे नाराजी नाट्याचे पडसाद कायम असल्याचे प्रकर्षाने जाणवले.





